निर्भीडसत्ता न्यूज –
प्राधिकरण, निगडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईसह कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यातील त्रुटी शोधण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपमहापौर शैलजा मोरे यांनी गुरूवारी (दि.१८) दिली.
प्राधिकरणात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशी त्रस्त आहेत. त्यासंदर्भात उपमहापौर मोरे यांनी गेल्या आठवड्यात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पाणीपुरठा विभागाकडून या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. काही भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतो. काही भागात कमी दाबाने पाणी येते. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत उपमहापौर मोरे म्हणाल्या, काही भागात विद्युत मोटारी लावून पाणी खेचले जाते.परिणामी, इतरांकडे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाण्याचा मीटरमध्ये गाळ साचल्याने पाणी गढूळ येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे निरीक्षण आहे. अद्याप सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर या परिसरात पूर्ण क्षमतेने नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.