निर्भीडसत्ता न्यूज – शहर परिसरात दिवसेंदिवस अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. शहरात दर रोज किमान दोन अपघातांची नोंद होते. ज्यामध्ये पादचाऱ्याच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. आज ही अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नाही. तसेच अपघातातील आरोपी वाहनचालक अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी पोलिसांच्या कारवाईच्या भितीपोटी वाहनांसह पसार होतात.
गुरुवारी (दि.१) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत चार फेटल अपघातांची नोंद झाली. हे अपघात निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. बऱ्याचशा अपघातांमध्ये आरोपी वाहन चालकाच्या अपुऱ्या माहितीमुळे तसेच तो पळून जात असल्याने अपघात ग्रस्त नागरिकांना न्याय मिळत नाही. तसेच भितीपोटी प्रत्यक्षदर्शी आरोपी वाहनचालक किंवा त्याच्या वाहनाची माहिती देखील देत नाहीत. यामुळे तपासात अडचणी येऊन विलंब होते.
अपघाती गुन्ह्यातील तपासाचा आकडा शुन्य आहे. यामुळे अपघातापासून वाचण्यासाठी तसेच अपघातात जखमी किंवा मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत, मोबदला किंवा नुकसान भरपाई मिळत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना वाहतुक नियोजनाचा चांगला अनुभव असल्याने त्यांनी तळवडे, वाकड, हिंजवडी या ठिकाणी जातीने लक्ष घालून वाहतुकीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आयुक्तालय हद्दीतील बऱ्याच ठिकाणी आजही वाहतुकीची परिस्थिती जैसे थेच आहे.
मुंबई-पुणे बाय पासवर चांदणी चौक ते देहुरोड एक्झीट पर्यंत लुटमार आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी ओव्हर हेड व्हॉकर बसवण्यात आले नसल्याने रस्ता ओलांडताना बऱ्याचशा पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वाकड, हिंजवडी आणि देहुरोड पोलिस ठाण्यात आहे. यामुळे पोलिस प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य शासनाने एकत्रीत येऊन तोडगा काढण्याची स्थानिकांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. सध्या तातपुरत्या स्वरुपात का होईना पोलिसांनी उत्तम नियोजन करुन अपघातांवर अंकुश आणावा, अशी अपेक्षा शहरवासियांची आहे.