निर्भीडसत्ता न्यूज ।
-महापालिका स्थायी समितीची निर्णय
सन 2015 नंतर 300 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राचे छोटे-छोटे तुकडे केल्यास त्या मोबदल्यात 100 ऐवजी केवळ 30 टक्के दिलासा रक्कम शेतकरी व जागामालकास अदा करावी, असा निर्णय स्थायी समितीने ऐनवेळी घेतला आहे. या निर्णयामुळे तुकड्या तुकड्याने जमीन असलेल्या जागामालकांना मोबदला कमी मिळणार आहे. मात्र, त्यात महापालिकेची आर्थिक बचत होणार आहे, असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केला आहे.
स्थायी समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सभेत ऐनवेळी हा विषय मंजुर करण्यात आला. पालिकेच्या वतीने विविध विकास कामे केली जातात. त्यासाठी गरज पडल्यास पालिका खासगी जागा ताब्यात घेते. खासगी वाटाघाटीचे जागा ताब्यात घेताना संबंधित जमीन मालकास मोबदला अदा करताना 30 टक्के दिलासा रक्कम दिली जाते, असा ठराव पालिका सभेने 21 नोव्हेंबर 2013ला मंजुर केला होता.
नवीन भूसंपादन कायदा 2013मधील तरतुदीनुसार त्या ठरावात बदल करण्यात आला. जागेचे क्षेत्र 300 चौरस मीटरपर्यंत आहे, अशा बाधीत छोट्या-छोट्या जागामालकांना 100 टक्के दिलासा रक्कम द्यावी. तसेच, 300 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या जागामालकांना 30 टक्के दिलासा रक्कम द्यावी, असा निर्णय 20 नोव्हेंबर 2015ला पालिके सभेने घेतला होता. त्यानुसार आतापर्यंत नगररचना विभाग खासगी जागामालकांना मोबदला देत आहे.
मात्र, 300 चौरस मीटरपेक्षा कमी जागा असल्यास 100 टक्के मोबदला मिळत असल्याने अधिक आर्थिक लाभासाठी काही जागामालकांनी 300 चौरस मीटरपेक्षा जास्त जागेचे छोटे-छोटे तुकडे करतात. परिणामी, पालिकेवर आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबर 2015 नंतर 300 चौरस मीटर जागेचे विभाजन करून छोटे-छोटे तुकडे केल्यास त्या जागामालकांनाही 100 टक्केऐवजी 30 टक्केच दिलासा रक्कम द्यावी, असा निर्णय स्थायी समितीने ऐनवेळी घेतला आहे. या विषयाला सदस्य व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी विरोध दर्शविला. त्याचा विरोध नोंदवून हा विषय मंजूर करण्यात आला. या निर्णयाची शिफारस पालिका सर्वसाधारण सभेकडे केली आहे.