मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊन राज्यात संचारबंदी लागू करत आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. २३) जाहीर केले. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आत्ता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रविवारी ज्याप्रमाणे सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
संचारबंदीच्या काळात काय काय सुरु राहणार?
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार
किराणाची दुकानं
मेडिकल्स
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दवाखाने, रुग्णालयं