निर्भीड न्यूज –
काळेवाडीतील नढेनगर, प्रभाग क्रमांक 47 मधील काही भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात स्वच्छ आणि शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काळेवाडी येथील ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांनी केली आहे.
तापकीर यांनी याबाबत महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना निवेदन दिले आहे. तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अश्विनी कॉलनी, सहकार कॉलनी क्रमांक 1, 2, 3, श्रीकृष्ण कॉलनी क्रमांक 3, आझाद कॉलनी 1, 2, 3, शंभुराज कॉलनी या परिसरात अळ्या असलेले, दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही समस्या त्वरित सोडवून या परिसरात स्वच्छ आणि शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.