निर्भीड न्यूज –
काळेवाडीतील काही कॉलन्यांमध्ये सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरात होत आहे. यासाठी वारंवार महापालिकेच्या प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे नढे यांनी निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, काळेवाडी येथील फिनोलेक्स कॉलनी, गजराज कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, स्वराज कॉलनी, मारूती मंदिर परिसर, ज्योतिबानगर, सूर्य किरण कॉलनी, मातृछाया कॉलनी या आठ कॉलन्यांमध्ये मलमिश्रीत पाणी येत आहे. त्यामुळे परिसरात अतिसाराची लागण होत आहे.
या समस्येबाबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. महापालिका आयुक्तांकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला; त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठ्याचा हा प्रश्न सोडवला गेला नाही, तर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, किंवा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नढे यांनी निवेदनातू दिला आहे. या उपोषणाला किंवा आंदोलनाला महापालिका आयुक्त जबाबदार राहतील, असेही या निवेदनात नमूद केले आहे.