मेढा – प्रतिनिधी | सोमनाथ साखरे
निर्भीडसत्ता न्यूज –
जावळी तालुका शुरवीरांची भूमी असून इतिहास काळापासून देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. शहीद रवींद्र धनावडे यांनीही दोन अतिरेक्यांचा खात्मा करून पोलिसांच्या कुटुंबियांची सुटका केली, त्यांनी अतुलनीय पराक्रम केला असून त्याचा प्रत्येक जावलीकराला आज अभिमान आहे. आज त्यांचं हे शौर्य स्मारक तालुक्यातल्या प्रत्येकाचं शक्तिस्थळ बनाव,युवकांनी त्याची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मोहाट येथे शहीद रवींद्र बबन धनावडे यांच्या शौर्य स्मारक लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, जि प सदस्या अर्चना रांजणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक बी .के .टोप्पो, कमांडन्ट संजीवकुमार, उपकमांडन्ट सचिन गायकवाड, सहा कमांडन्ट संतोष भोसले, उपनिरीक्षक रवींद्र झगडे, सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने, पं स सदस्य विजय सुतार, जयश्री गिरी व व्यसनमुक्त संघाचे माजी राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ, माजी सभापती कांतीभाई देशमुख, मेढ्याचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, आर पी आयचे माजी अध्यक्ष डॉ . संपतराव कांबळे , राजेंद्र जाधव, रवींद्रची आई,पत्नी,मुलं, भाऊ, यांच्यासह मोहाट गांवचे ग्रामस्थ , युवक , महिला मान्यवर, शिक्षक , शालेय विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले कि, जावली तालुक्यातील सात जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे . यातील प्रत्येकाने अतुलनीय असा पराक्रम केला आहे शहीद रवींद्रने काश्मीर मधील पुलवामा येथे दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालून पोलीस वसाहतीतील नागरिकांची सुटका केली मात्र त्यासाठी त्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली .रवींद्रच्या शौर्याची दखल सरकारने घेतली आणि त्याला शौर्य चक्र जाहीर झाले याचा प्रत्येक जावलीकराला अभिमान आहे .
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक बी. के . टोप्पो म्हणाले कि, रवींद्रने मोठे शौर्य दाखवून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे .आज देशाला परकीय शत्रूपासून धोका कमी आहे मात्र देशांतर्गत शत्रूंचेच मोठे भय निर्माण झाले आहे त्यामुळे आमचं नाव राखीव असलं तरी आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं आहे .रवींद्रचा परिवार हा केंद्रीय राखीव पोलिसांचा परिवार असून तो कायम राहील त्याच्या कुटुंबाला आमच्या कडून सर्वतोपरी सहकार्य राहिल. जो पर्यंत भारत देश आहे तो पर्यंत रवींद्रचे नांव अजरामर राहाणार आहे.
दरम्यान शहीद रवींद्र यांच्या अर्धाकृती पुतळ्याची मेढा ते मोहाट अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली शहीद रवींद्र बबन धनावडे मेमोरियल फाउंडेशन,धनावडे कुटुंबियांच्या वतीने व मोहाट ग्रामस्थानच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या शौर्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, व बी के टोप्पो यांच्या हस्ते करण्यात आले शहीद रवींद्र यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी वीरमाता व वीरपत्नी यांचा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वतीने उपमहानिरीक्षक बी. के. टोप्पो यांच्या हस्ते यथोचीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहीद रवींद्र बबन धनावडे मेमोरियल फाउंडेशन व मोहाट ग्रामस्थांचे वतीने दिवसभरामध्ये रक्तदान शिबीर , शालेय विद्यार्थाचा गुणगौरव सोहळा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.