पिंपरी। प्रतिनिधी।निर्भीडसत्ता न्यूज
वाल्हेकरवाडी आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारी ला आळा बसवा याकरिता वाल्हेकर वाडी येथे पोलीस चौकी व्हावी अशी येथील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी प्रजासत्ताक दिनी पूर्ण झाली. चिंतामणी चौकातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवरील 3 गुंठे जागेत बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उदघाटन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे,चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे प्राधिकरणाचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे,नगरसेवक नामदेव ढाके,बाळासाहेब ओव्हाळ, स्वीकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, राजू दुर्गे, अमोल थोरात, शेखर चिंचवडे, बाळासाहेब वाल्हेकर,उद्योजक ओमप्रकाश पेठे, तात्या आहेर, दीपक वाल्हेकर, निलेश भोंडवे,सागर चिंचवडे आदी सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
भयमुक्त आणि सुरक्षतेची नागरिकांना हमी : बिष्णोई
याप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की नवीन निर्माण झालेल्या पोलीस चौकी मुळे वाल्हेकरवाडी परिसरातील महिला,विद्यार्थिनी,नागरिक ,ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहतील.येथे नियुक्त असणारे पोलीस कर्मचारी येथेच नागरिकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.नवीन निर्माण झालेले पोलीस आयुक्त हे महापालिकेच्या जागेत आहे.आयुक्तालयासाठी स्वतःच्या मालकीची स्वतंत्र जागा नाही अशी खंतही बिष्णोई यांनी व्यक्त केली.आवश्यकते नुसार ठिकठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती केली जाते परंतु कालांतराने पोलीस चौकी कर्मचाऱ्या अभावी बंद होतात असा प्रकार या चौकी बाबत होणार नाही याची पोलीस प्रशासन पूर्णपणे दखल घेईल असे सांगत भयमुक्त आणि सुरक्षतेची नागरिकांना हमी दिली.
पोलीस चौकी होणे भूषणावह नाही : लक्ष्मण जगताप
एखाद्या परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला की तेथे पोलीस चौकी निर्माण करावी लागते परंतु पोलीस चौकी होणे हे परिसराला भूषणावह नाही. भविष्यात गुन्हेगारी वाढु नये यासाठी सर्व नागरिकांमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे.शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बल उपलब्ध नाही तरी सुद्धा पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे.आभार भिमराव शिंगाडे यांनी मानले.
चौकट: चिंचवड विभागात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सर्वाधिक गुन्हे वाल्हेकर वाडी विभागात होत असल्याची नोंद आहे हे गुन्हे कमी होण्यासाठी ही पोलीस चौकी उपयुक्त ठरेल येथे 3 अधिकारी,6 कर्मचारी आणि मार्शल यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे आपल्या प्रास्ताविकात पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले.
आपला वाल्हेकरवाडी प्रभाग भयमुक्त व गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन,जागेसाठी प्राधिकरण प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आज आपणा सर्वांचे पोलीस चौकीचे स्वप्न पूर्णत्वास आले.या पोलीस चौकीमुळे नागरिक,महिला,विद्यार्थिनी अधिक सुरक्षित राहतील असा मला विश्वास आहे असे माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.