पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेने प्रशस्त पदपथ तयार केले आहेत. त्या पदपथांवर अतिक्रमण काढले आहेत. पदपथांवर अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या व अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचार्यांना चालणार्यांसाठी पदपथ रिकामा राहत नाही. पदपथांवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे. त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी तक्रारी करीत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (दि.12) जनसंवाद सभा झाली. त्यात एकूण 57 तक्रारी करण्यात आल्या. पदपथावर झालेले अतिक्रमण महापालिकेने तत्काळ हटवावे. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्यांची साफसफाई नियमितपणे करावी. रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या ड्रेनेजलाईनची तातडीने दुरूस्ती करावी, अशा तक्रारीही सभेत नागरिकांनी केल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, डॉ. अंकुश जाधव, राजेश आगळे, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे व अधिकारी उपस्थित होते.