निर्भीडसत्ता न्यूज –
पाटबंधारे व महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी – पाललोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे कमी कालावधीत पवना धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २६) सकाळी दहा वाजल्यापासून धरणाजवळील विद्यूत निर्मिती केंद्रासाठी १३०० क्यूसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाणी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना व रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर जून महिन्यात पावसाने मोठी दडी मारली होती. पावसाने दडी मारल्यामुळे धरणातील पाण्यासाठा घटला होता. त्यानंतर पवना धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसला. कमी अधिक प्रमाणात पावासाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरणाच्या पाणीसाठा सोमवारी सकाळपर्यंत ९० टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला. धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाजवळील हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे १३०० क्यूसेक या वेगाने पाणी नदीत पात्रात सोडले जात आहे. दरम्यान, पावसाच्या प्रमाणात नदी पात्रात सोडण्याच्या पाण्याचेप्रमाण कमी अधिक होईल. त्यात अधिक पावसामुळे धरण ओव्हर फ्लो झाल्यास सांडव्यामधून पाणी सोडण्याची तयारीही करण्यात आली आहे. तुर्तास फक्त विजनिर्मीती प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.