निर्भीडसत्ता न्यूज –
आद्योगिक कंपन्यांकडून सोडल्या जाणा-या रसायनमिश्रित दुषित पाण्यामुळे इंद्रायणी नदीत पात्रात माशांचा मृत्यू होत आहे. हा गंभीर प्रकाराची दखल घेत महापौर नितीन काळजे यांनी मोशीत इंद्रायणी नदीची पाहणी केली. तसेच, सुमारे २८ कंपन्या त्यासाठी कारण असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरून तळवडे ते च-होलीपर्यंत इंद्रायणी नदी वाहते. नदी पात्राजवळ तळवडे, मोशी, चिखलीत पालिका हद्दीत, तसेच पलिकडे काही गावांमध्ये देखील कारखाने आहेत. या कारखान्यांमधून रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. त्या दुषित पाण्यामुळे नदी पात्रात मासे मृत्यूमुखी पडत आहेत. हा प्रकार समजल्याने महापौर काळजे यांनी गुरुवारी मोशीत नदी पात्राची पाहणी केली. त्यात कंपन्यांमधून सोडल्या जाणा-या दुषित पाण्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे.
त्यापैकी काही कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी सोडण्यास परवानगी दिलेली आहे. शहरातील एमआयडीसीबरोबर चाकण एमआयडीसीतील कारखान्यांचाही समावेश आहे. या सुमारे २८ कारखान्यांमधून दुषित पाणी सोडले जाते. ते बंद कर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर काळजे यांनी प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिका-यांकडे तातडीने पत्र पाठवून केली आहे. तर, नदी प्रदूषण रोखण्यासाठी पालिका अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले.