निर्भीडसत्ता न्यूज –
कमी वयात संपत्ती हाती आली की, त्याचा गैरवापर जास्त होण्याची शक्यता असते. त्यासाठी व्यवहारात बुध्दी पाहिजे आणि परमार्थात भावना पाहिजे. प्रत्येकाकडे बुध्दीचातुर्य आवश्यक आहे. जेणे करून संपत्तीचा योग्य विनियोग करता येईल, असे मत आळंदीकर हभप भागवतमहाराज साळुंखे यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहातील पहिल्या दिवसाचे कीर्तन हभप साळुंखेमहाराज यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा लाडकी ‘लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले. सप्ताहाचे मुख्य आयोजन महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका उषा काळे, बजरंग नढे, दिलीप काळे, प्रमोद नढे, शिवाजी काळे, सखाराम नखाते, अनिल कदम, बाजीराव काळे, जयराम शिंदे, तुषार पवार आदी या वेळी उपस्थित होते. हार्मोनियम वादक बापूराव सयाजी साके पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
हभप साळुंखेमहाराज या वेळी म्हणाले की, समाजशास्त्राने काही बाबी आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबविल्या आहेत. यातून माझा देश, माझे राज्य अशी भावना उदयास आली. जीवन जगताना बुध्दी आणि भावनांचा समन्वय करावा लागतो. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून जीवन प्रवास करावा लागतो. त्यातूनच परमार्थ साधता येतो. आपला जन्म कशासाठी आहे, याचा विचार करून जन्माचे प्रत्येकाने सार्थक केले पाहिजे. केवळ पैसा असून काही उपयोग नाही, माणूस भावनिक होतो, अशा वेळी बुध्दीचा वापर आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक अटळ आहे.