निर्भीडसत्ता न्यूज- ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण यांना दूरध्वनीवरून खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेकडे आणि अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अनोळखी व्यक्तीने आतापर्यंत तीन वेळा दूरध्वनी करून खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिली, असे उदित नारायण यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी गेल्यावर हे दूरध्वनी येतात. दूरध्वनी करणारा आपण रवी पुजारी असल्याचे सांगतो आणि शिवीगाळ करत मोठ्या रकमेची मागणी करतो. पैसे न दिल्यास जीवाला मुकशील, अशा धमक्या दिल्या जातात, असे त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून दूरध्वनी करणाऱ्याचे ठिकाण बिहारमध्ये असल्याचे उघड झाले आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाच्या सिमकार्डची नोंद उदित नारायण यांच्या सोसायटीच्या रखवालदाराच्या नावावर आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, चौकशी सुरू केली आहे. संशयितांवर नजर ठेवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.