सातारा । निर्भीडसत्ता न्यूज
करोनाविरुद्धची लढाई तीव्र करीत भुईंज पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून सुरू केलेल्या धडक मोहिमेत 19 दुचाकी जप्त केल्या. दरम्यान, नागरिकांनी आदेशांचे उल्लघन केल्यास यापुढे कारवाईची मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र भावना व्यक्त करत बेजबाबदार वागणाऱ्यांची “आता खैर नाही’ अशा शब्दांत संकेत दिले होते. त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय येऊ लागला आहे. मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वारंवार लोकांना आवाहन करीत आहेत, असे असूनही काहीजण नाहक रस्त्यावर दुचाक्या दामटत आहेत.
अशा दुचाकीस्वारांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातच कारवाईचा फास आवळला आहे. त्याचाच परिपाक म्हणून भुईंज पोलीस देखील आक्रमक झाले आहेत. बुधवारी सायंकाळ पासून धडक कारवाई सुरू करण्यात आली. ज्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत अशांच्या दुचाक्या थेट जप्त केल्या आहेत. दरम्यान, जनतेने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी केले आहे.