पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचे आजार होत आहे. त्या संदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, हे आजार दूषित पाण्यामुळे होत नाहीत. महापालिकेचे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य आहे, असा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. तसेच, शिळे व बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नये, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
उलट्या, जुलाब व पोटदुखीच्या तक्रारी शहरात वाढल्या आहेत. ज्या भागातील तक्रारी आहेत, त्या भागातील पाणी तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व ठिकाणी पाण्यात क्लोरीन आढळून आले आहे. पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरीन असणे, हे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याबाबत बाहेरील प्रयोगशाळेतूनही खातरजमा करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी आवाहन केले आहे.