पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आंद्रा धरणातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात 100 एमएलडी पाणी आणण्यात आले आहे. ते पाणी शुद्ध करून शहराला दिले जाणार आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
पवना धरणातून 490 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी असे एकूण 520 एमएलडी पाणी दररोज शहराला दिले जात आहे. पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने पालिका शहराला गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी देत आहेत. शहरात पाण्याची मागणी वाढली असून, काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
पालिकेने आंद्रा धरणातून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधार्यातून 100 एमएलडी पाणी उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले आहे. तेथून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक टाक्यांना जोड देण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे सर्व काम ऑक्टोबर 2023 ला पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटन न झाल्याने अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेले नाही.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. ते संपल्यानंतर चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे तातडीने उद्घाटन कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यानंतर शहराला तेथून दररोज 100 एमएलडी पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे त्या भागात निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून केला जाणारा पाणीपुरवठा बंद केला जाईल. ते अतिरिक्त पाणी शहरातील इतर भागात वळविले जाणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.