निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय संविधानामुळे भारतासारख्या खंडप्राय, बहुसंस्कृती संपन्न देशात जात, वर्ण, वंश, पंथ, धर्म, लिंग या घटकांवर आधारीत कोणताही भेदभाव न मानता सर्व नागरिकांना समान आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय व संधी मिळत आहे. भारतीय संविधान हे विसाव्या शतकातील सर्वांत मोठा आदर्श ग्रंथ आहे. यामुळे प्रजासत्ताक व्यवस्थेत सर्व अधिकार नागरिकांना आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या सार्वभौम राष्ट्रात वृध्दीगंत होण्यासाठी सर्वांनी या आदर्श संविधानाचे पालन केले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. यशोधरा नितनवरे यांनी केले.
भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव, संयुक्त जयंती समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त रविवारी (दि. 26 नोव्हेंबर 17) संस्थेचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल आणि माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे गुरव येथील सृष्टी हॉटेल चौकात नागरिकांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांनी दहशतवाद विरोधी तसेच देशात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील रहाण्याची उपस्थितांना सामुहिक शपथ दिली.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, एनसीपीचे युवा नेते शाम जगताप, तानाजी जवळकर, राहुल काकडे, हरीष गायकवाड, हुसेन मुलाणी, संजय साळवे, संदिप नितनवरे, चंद्रकांत वाखोडे, रवी कांबळे, लता शार्दुल, उषा शिंदे, अर्चना सिंग, शितल पाथाडे, प्रदिप पवार, निलचंद्र निकम आदी उपस्थित होते.
डॉ. नितनवरे म्हणाल्या की, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकशाही संपली की, सामान्य लोकांचे जीवन उध्वस्त होईल. हे व्हायला नको असेल तर भारताच्या संविधानाचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. देशातील सव्वाशे कोटींहून जास्त नागरिकांचे सर्वांगीण हित या संविधानाचे पालन करण्यामुळे होईल.